Wednesday, March 9, 2011

तू भेटली नव्हतीस तोवर

तू भेटली नव्हतीस तोवर चालले होते बरे
लक्षात नाही यायचे तेव्हा मनावरचे चरे

आपण जिथे भेटायचो ही त्या पुलाचीही व्यथा
चिक्कार पाणी वाहिले उरले तरीही भोवरे

ईमेल, एसेमेस येती रोज पाचोळ्यापरी
गेली कुठे गंधाळलेली ती जुनी पत्रोत्तरे?

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे?

कुठल्या विचारांची तुझ्या डोक्यात दंगल माजली?
उध्वस्त झाल्या कल्पना नुसतीच उरली अक्षरे

तो श्वास होता कोणता गळफास ज्याने लावला?
तो भास नक्की कोणता... मी मानले ज्याला खरे?

मी कोण? का आलो इथे? जाणार कोठे शेवटी?
पडतात असले प्रश्न का?... छळतात ज्यांची उत्तरे

1 comment:

Anonymous said...

Hi
I am a regular follower of http://kathapournima.blogspot.in/
And since Dec end she has not posted anything. I hope everythig is well @ her end. And hoping to get her back to her blog soon.

Regards,
Shilpa